#Corona lockdown:लॉकडाऊननंतर परप्रांतिय मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडा; उपमुख्यमंत्र्यांचं रेल्वेमंत्र्यांना पत्र
![Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/ajit-pawar-770x431-2.jpg)
मुंबई : “लॉकडाऊननंतर परप्रांतिय मजुरांना घरी जाण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मुंबई आणि पुण्यातून विशेष गाड्या सोडाव्यात. त्यासाठी आधीच नियोजन करावं,” अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून परप्रांतीय मजुरांच्या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली आहे.
“केंद्र सरकारने लागू केलेल्या देशव्यापी लॉकडाऊनची मुदत 3 मे रोजी संपत आहे. लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर रेल्वेसेवा सुरु झाली तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी थांबलेले परप्रांतीय मजूर आपापल्या गावी परतण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडतील. त्यामुळे गर्दी उसळून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने मुंबई आणि पुण्यातून देशाच्या विविध भागात जाण्यासाठी विशेष गाड्या सोडाव्यात, त्यासाठी आधीच नियोजन करावं,” असं अजित पवार यांनी पियुष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.q
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/23151838/Ajit-Pawar-Letter-to-Rail-Ministry-768x1024.jpg)
अजित पवार यांनी पुढे लिहिलं आहे की, “महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य असल्याने तसंच इथला बांधकाम व्यवसाय मोठा असल्याने उत्तर प्रदेश, बिहारसह इतर राज्यातून येणाऱ्या परप्रांतीय मजुरांची संख्या देशात सर्वाधिक आहे. केंद्र सरकारने 24 मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन लागू केल्यापासून उत्तर प्रदेश, बिहारसह देशाच्या विविध राज्यातील मजूर महाराष्ट्रात ठिकठिकाणी अडकले आहेत. राज्य सरकारने त्याच्यासाठी शिबिराची व्यवस्था केली असून निवारा, जेवण, आरोग्य सेवा पुरवली जात आहे. सरकारच्या या शिबिरांमध्ये सध्या साडेसहा लाख मजूर राहत आहेत. स्वयंसेवी संस्थांद्वारेही तितक्याच मजुरांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. ती यापुढेही निश्चितपणे करण्यात येईल.”