ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, त्याच महाराजांच्या राजमुद्रेने नौदलाच्या ध्वजावरील पारतंत्र्याची शेवटची ओळख पुसली
![Chhatrapati Shivaji Maharaj, who ushered in the era of Swarajya, the royal seal of the same Maharaja erased the last trace of sovereignty from the naval flag.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/devendra-fadnavis-compressed-5-1.jpg)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
मुंबई : ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, त्याच महाराजांच्या राजमुद्रेने नौदलाच्या ध्वजावरील पारतंत्र्याची शेवटची ओळख पुसली गेली. आज प्रत्येक शिवभक्तासाठी, महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत, पण नौदलाच्या ध्वजात आजही ब्रिटिशांच्या राजवटीतील खुणा तशाच होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारतंत्र्याची प्रत्येक ओळख पुसली जावी, हा संकल्प केला होता. भारतीय नौदलाला शुक्रवारी नवा ध्वज प्राप्त झाला आणि त्याचे अनावरण पंतप्रधान मोदी यांनी केले. सर्वात आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणजे, हा ध्वज तयार करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा घेत राजमुद्रेतून नवे चिन्ह साकारण्यात आले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
सागरी सुरक्षा आणि नौदलाची प्रथम निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीने केली होती. अतिशय भक्कम आणि मजबूत असे नौदल त्या काळात साकारण्यात आले होते. त्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण आणि शिवकार्याचा यथार्थ गौरव आज यानिमित्ताने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत झाला, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.