मुंबई, ठाण्यासह कोकणात आज अतिवृष्टीची शक्यता
![Rain in winter… and now the danger of hurricanes too!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/rain.jpg)
मुंबई – मुंबई आणि उपनगर परिसरात शनिवारी दिवसभर ऊन होते. पावसाची फारशी चिन्हे दिसत नव्हती, परंतु रात्री ११ वाजता हे चित्र बदलले. शहर आणि उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री १२ वाजल्यानंतर पावसाने रौद्ररूप धारण केले. १२ ते २ या वेळेत मुंबईच्या सर्वच भागांत अतिमुसळधार पाऊस कोसळला, तर काही भागांत अतिवृष्टी झाली. मध्यरात्री दीड ते दोन तासांत अनेक भागांत २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळल्याची नोंद करण्यात आली. किनारपट्टीवरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई, ठाण्यासह कोकणात सर्वच ठिकाणी धुवाधार पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. तसेच हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभागात आणि पश्चिम-मध्य महाराष्ट्रात आज सोमवारीही (१९ जुलै) अतिवृष्टीची शक्यता आहे.
मुंबईतील सर्वच भागांत दीडशे मिमीहून अधिक पाऊस पडला, तर काही भागांत २०० मिमीपेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस दहिसरमध्ये पडला. दरम्यान, मुंबईत शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ३३ नागरिकांचा बळी घेतला. बहुतेक नागरिकांचा मृत्यू दरड आणि भिंत कोसळून झाला, तर विविध दुर्घटनांमध्ये १२ नागरिक जखमी झाले.
मुंबईत किती पाऊस झाला?
दहिसर – २४५.८४ मिमी
चेंबूर – २४१.०५ मिमी
विक्रोळी पूर्व – २३७.९८ मिमी
कांदिवली – २३२.४१ मिमी
मरोळ – २२८.८५ मिमी
मुलुंड – २२७.५५ मिमी
सीएसएमटी स्थानक परिसर – २२२.७४ मिमी
बोरिवली – २२२.२३ मिमी
वरळी – २२१.७१ मिमी