करण जोहरच्या पार्टीमधील मंत्र्याचे नाव जाहीर करा, अन्यथा माफी मागा, महापौरांचे आशिष शेलारांना आव्हान
![Announce the name of the minister in Karan Johar's party, otherwise apologize, Mayor challenges Ashish Shelar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/kishori-pedneekar.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेत्री अमृता अरोरा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर निर्माता दिग्दर्शक करण जोहरने आयोजित केलेली पार्टी चांगलीच चर्चेत आली आहे. या पार्टीला राज्य मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला होता. आशिष शेलार यांच्या या आरोपाला मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज आव्हान दिले आहे. खोटे आरोप करू नका, त्या पार्टीत जे मंत्री सहभागी झाले होते. ते सिद्ध करा, नाहीतर जनतेची माफी मागा, असे आव्हान किशोरी पेडणेकर यांनी शेलार यांना दिले आहे. आशिष शेलार आमदार झाले, त्यानंतर मंत्री झाले. परंतु, त्यांचा जीव अजूनही महापालिकेत घुटमळत आहे. असे असेल तर त्या जीवाला आता मोकळं करा, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी शेलार यांना लगावला.
करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झालेल्या अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांच्यासह इतर आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्टीवरून बरेच वाद निर्माण झाल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनीही गंभीर आरोप केले होते. या पार्टीमध्ये राज्य सरकारमधील एक मंत्री सहभागी झाले होते, असा आरोप आशिष शेलार यांनी केला होता. शेलार यांच्या या आरोपाला मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेत आव्हान दिले आहे.
पेडणेकर यांनी यावेळी शेलार यांच्यावर कडाडून टीकाही केली. त्या म्हणाल्या, आम्ही शिवसेनेच्या रणरागीणी आहोत. खोटे आणि बेछुट आरोप आम्ही खपवून घेणार नाही. मंत्र्यांना बदनाम करण्याचे काम सुरू असून खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली जात आहे. परंतु, जनतेला सुद्धा आता तुमचा खोटारडेपणा समजला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निष्काळजीपणा करून चालणार नाही. करण जोरहच्या पार्टीत सहभागी सेलेब्रिटींवर पालिकेने योग्य कारवाई केली आहे. परंतु, शेलार यांनी त्या पार्टीला राज्य मंत्री मंडळातील एक मंत्रीही उपस्थित होते असा आरोप केला होता. लोकशाहीने अधिकार दिले आहेत. त्याचा अपमान करू नका. आशिष शेलार आणि भाजपचे नेते खोटे बोलण्याची एकही संधी सोडत नाहीत. खोटं बोल पण रेटून बोल, अशी वृत्ती वाढत आहे, अशी टीका पेडणेकर यांनी यावेळी केली.