राज्यातील एनआयए पथकाचे प्रमुख अनिल शुक्ला यांची अचानक बदली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/ANILA-SHUKLA.jpg)
मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीयांच्या घराबाहेर एका कारमध्ये ठेवण्यात आलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएच्या पथकाचे नेतृत्व करणारे महानिरीक्षकअनिल शुक्ला यांची अचानक बदली करण्यात आली आहे.त्यांच्या जागीआता ज्ञानेंद्र वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मात्र या बदलीवर राष्ट्रवादी काँग्रेसने संशय व्यक्त केला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी या बदलीवरून थेट केंद्र सरकारवरच गंभीर आरोप केला आहे.
आतापर्यंत याप्रकरणी सचिन वाझे ,विनायक शिंदे, रियाझ काझी यांच्यासह अनेक आरोपींना अटक केली असून हा तपास सध्या अत्यंत महत्त्वाच्या वळणावर असतानाच अनिल शुक्ला यांच्या बदली करण्यात आली आहे.त्यामुळे या बदलीची चौकशी झाली पाहिजे आणि अचानक बदली करण्यामागे कारण काय ? असा सवाल राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. शुक्ला यांनी परमवीर सिंग यांना मुख्य आरोपी केले आहे.कदाचित हे केंद्र सरकारला नकोसे वाटत असावे.तसेच परमवीर सिंग यांनाच आता माफीचा साक्षीदार व्हावेसे वाटत असावे हे या बदलीवरून स्पष्ट होत असल्याचा संशय हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे अनिल शुक्ला यांना प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात पाठवले होते. त्यांचा 6 वर्षांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपूनही त्यांना इथे काही काळ मुदतवाढ दिली होती. पण आता अचानक बदली करण्यात आल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा रंगू लागली आहे.अनिल शुक्ला हे मिझोराम केडरचे 1998च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.