कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी ३१ मार्चपर्यंत ‘एसओपी’ लागू करणार: उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई – राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत एसओपी तयार करुन लागू करण्यात येईल. ही एसओपी राज्यातील सर्व कोविड सेंटरसाठी बंधनकारक असेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.
राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत एसओपी (मानक कार्यप्रणाली) तयार करुन लागू करण्यात येईल. ही एसओपी राज्यातील सर्व कोविड सेंटरसाठी बंधनकारक असेल. #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२१
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 4, 2021
वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 21,79,185 वर
औरंगाबाद शहरातल्या रुग्णालयात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर बोलताना अजित पवार यांनी एसओपीबाबत माहिती दिली. ‘औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल भगिनीच्यासंदर्भात घडलेली विनयभंगाच्या प्रयत्नाची घटना दुर्दैवी आहे. संबंधित भगिनीवर बलात्कार झालेला नाही. मात्र, विनयभंगाचा प्रयत्न होणे हे देखील वाईट कृत्य आहे. सरकारने ही संपूर्ण घटना गांभीर्याने घेतली आहे. याप्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे’, असे पवार म्हणाले. तसेच ‘विनयभंगाचा प्रयत्न झाल्याचा भगिनीच्या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने आरोपी डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले आहे. भगिनीचे नाव गोपनीय ठेवण्यात येत आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल’, असेही त्यांनी स्पष्ट केले.