सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा पेन्शनसाठी गांधी जयंतीपासून आंदोलनाचा इशारा
मुंबई – अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होऊन २ वर्षे झाली तरी पेन्शन मिळत नसल्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तेव्हा याबाबत सरकारने ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत निर्णय न घेतल्यास गांधी जयंतीपासून म्हणजे २ ऑक्टोंबर २०२१ पासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जे कर्मचारी अनुसुचित जमातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात अपयशी ठरले अशा कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर सरकारने वर्ग केले. डिसेंबर २०१९पासून आतापर्यंत शेकडो अधिसंख्य पदावरील कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. मात्र त्यांना सेवानिवृत्ती वेतन अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनुसूचित जमातीमधून नियुक्त झालेल्या आणि जात प्रमाणपत्र वैधता दिली नसलेल्या कर्मचाऱ्यांना ११ महिन्यांच्या अधिसंख्य पदावर सरकारने वर्ग केले होते. मात्र या पदावरील कर्मचाऱ्यांना पेन्शन अजून सुरू झालेली नाही. याबाबतच्या समितीचा अहवाल आला नसल्याचे सांगून सरकारने ही भूमिका घेतली आहे. त्याच्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा ऑर्गनायझेशन फॉर राईट ऑफ ह्युमन महाराष्ट्रने राज्य सरकारला दिला आहे.