5 ऑगस्ट आजपासून मुंबईत 20 टक्के पाणीकपात
मंगळवारी मध्यरात्रीपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली असली तरी तलावांतील पाणीसाठ्यात फारशी वाढ झालेली नाही. मागील काही दिवसांपासून पावसाने मारलेली दडी आणि तलावांतील खालावत चाललेल्या पाणीसाठ्यामुळे आज, म्हणजे 5 ऑगस्टपासून मुंबईत 20 टक्के पाणीकपात करण्यात आलीये. समाधानकारक पाऊस आणि तलावांतील अपेक्षित साठा वाढेपर्यंत ही कपात कायम राहणार आहे. कपातीमुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे तसेच पाण्याची नासाडी करू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.
मागील वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे यंदा जूनपर्यंत विनाकपात पाणीपुरवठा करणे पालिकेला शक्य झाले. मात्र जून आणि जुलै या दोन महिन्यांमध्ये पावसाने म्हणावी तशी साथ न दिल्याने तलावातील पाणीसाठा आटत चालला आहे. मंगळवार ४ ऑगस्टला सर्व तलावांमध्ये मिळून ३४.९५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा खूपच कमी असल्याने पालिकेला पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागला आहे.
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात तलावांमधून दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. पावसाळा संपल्यानंतर म्हणजे ३१ ऑक्टोबरला पुढील वर्षभरासाठी विनाकपात पुरवठ्यासाठी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा असणे आवश्यक असते.
मुंबईच्या सुमारे दीड कोटी लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. आज, बुधवारपासून होणाऱ्या पाणीकपातीमुळे दररोज सुमारे ८०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची बचत होणार आहे.