१ ऑगस्टपासून मुंबई शहराच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात
मुंबई – मुंबई शहर आणि परिसरात चांगला पाऊस झाला असला तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ५ मोठ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे या धरणांमध्ये केवळ ३४ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे मुंबई महापालिकेने उद्या१ ऑगस्टपासून शहराच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात मुंबईकरांना पाणी कपातीच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणारी मोठी धरणे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आहेत. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत पडलेल्या पावसात या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. एरवी जुलैमध्ये ८० ते ९० टक्के भरणारी ही धरणे अजूनही रितीच आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेला शहराच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. आणखी काही दिवस जर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडला नाही तर ही पाणीकपात आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.