हिंदू-मुस्लिम यांच्यात दंगल घडवण्याचा संघाचा डाव, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/prakash-ambedkar-1.jpg)
मुंबई | महाईन्यूज
CAA, NRC, NPR आणि खासगीकरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला बंद हा शांततेच्या मार्गाने पुकारलेला बंद आहे. त्याला हिंसक वळण देऊन हिंदू मुसलमान दंगल घडवण्याचा संघाचा डाव आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत. बंदच्या दरम्यान काही लोक चेहरा लपवून बंदला हिंसक वळण लावत आहेत. त्यांना पोलिसांनी शोधून काढावं असं आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला बंद शांततेच्या मार्गाने सुरु आहे. आम्हाला तोडफोड करायची असती तर त्याची सुरुवातच हिंसक केली असती. आम्हाला तसं काहीही करायचं नाही. आमचा बंद हा शांततेच्या मार्गाने सुरु आहे, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी हे आरोप केले आहेत. आज वंचित बहुजन आघाडीतर्फे बंदची हाक देण्यात आली आहे. CAA, NRC, NPR आणि खासगीकरणाविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे.
महाराष्ट्र बंद हा सकाळपासून शांततेत सुरु होता. त्यानंतर मात्र या बंदला हिंसक वळण लागलं. याबाबत प्रकाश आंबेडकर यांना विचारलं असता हिंसाचार घडवणारे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नाहीत, असं त्यांनी सांगितलं आहे. काही लोक चेहरा लपवून हिंसा घडवत आहेत. या लोकांना पोलिसांनी शोधून काढावं असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.