स्मशानभूमींमध्ये पार्थिवावर टाकण्यासाठी लागणाऱ्या पांढऱ्या कापडांचा तुटवडा
ठाणे जिल्ह्य़ातील महापालिका, नगरपालिकांच्या अखत्यारीत असलेल्या स्मशानभूमींमध्ये काही खासगी स्वयंसेवी संस्था अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य पुरविण्याचे काम करतात. या संस्थांकडे गेल्या दीड महिन्यांपासून पार्थिवावर टाकण्यासाठी लागणारे पांढरे कापड उपलब्ध नसल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. घरातील अडगळीत, कपडय़ांच्या बस्त्यात बांधून ठेवलेल्या पांढऱ्या कापडाचा वापर करून मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे.
कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी, ठाणे महापालिकांच्या हद्दीत अनेक खासगी स्वयंसेवी संस्था पालिकेच्या अखत्यारीतील स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य ठेवतात. या संस्था विविध ठिकाणांहून गरजेप्रमाणे साठा मागवून घेतात.
राज्यातील अनेक भागांत करोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा वाढू लागल्याने करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांनी मोठय़ा संख्येने घाऊक कपडा व्यापाऱ्यांकडून पांढऱ्या कापडाचे तागे खरेदी केले. त्यामुळे स्थानिक पातळीवर कपडा व्यापाऱ्यांना पांढरे कापड मिळणे अवघड झाले आहे. तसेच दीड महिन्यापासून टाळेबंदी असल्याने वाहतूकही ब-याच प्रमाणात बंद आहे. त्यामुळे घाऊक पद्धतीने हा कपडा घेऊन येणारे ट्रक या कपडय़ाची वाहतूक करू शकत नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे.