सायनचा उड्डाणपूल तीन दिवस राहणार बंद, वाहतूक कोंडीची शक्यता
मुंबई – दुरुस्तीच्या कारणात्सव सायन येथील नानालाल मेहता उड्डाणपूल पुढील तीन दिवस बंद राहणार आहे. शुक्रवारी रात्री ११ वाजल्यापासून हा पूल बंद करण्यात आला असून दादारकडे जाणारी वाहतूक उड्डाणपुलाच्या खालून वळवण्यात आली आहे.
शीव आणि माटुंग्याला जोडणाऱ्या या उड्डाणपुलाच्या सांध्यामधील काही लोखंडी प्लेट तुटल्या आहेत. वाहतूक पोलिसांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती तत्काळ महापालिकेला दिली. त्यानुसार पालिकेने पाहणी करून तत्काळ दुरुस्तीच्या कामाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार काल रात्री 11 वाजल्यापासून दादरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
या उड्डाणपुलाचे काम एकूण 72 तासात पूर्ण होणार असल्याची माहिती पालिकेने वाहतूक पोलिसांना दिली आहे. काम सुरू असल्या दरम्यान वाहतूक कोंडी होणार आहे. त्यामुळे सायनवरुन मुंबईकड़े जाणाऱ्या प्रवाशांना थोड़ा फार त्रास सहन करावा लागणार.
वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ट्रॅफिक पोलिसांनी मोठ्या गाड्या पुलाखालून डायव्हर्ट केल्या आहेत. उपनगरातून मुंबईत जाणाऱ्या ट्रॅफिकवर याचा परिणाम होत आहे.