‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना निवडणूक आयोगाची नोटीस
मुंबई : ‘रोखठोक’ या सदरात निवडणूक प्रक्रियेबद्दल संभ्रम निर्माण करणारा मजकूर प्रकाशित केल्याबद्दल निवडणूक आयोगाने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाचे चांगलेच कान उपटले आहेत. यासंदर्भात ३ एप्रिल पर्यंत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत स्वतः रोखठोक हे सदर लिहितात.
सामना दैनिकाच्या ३१ मार्च रोजीच्या अंकात रोखठोक या सदरात ‘EVM घोटाळा बेगुसरायमध्ये झाला तरी चालेल’असे वाक्य समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे ईव्हीएमच्या वापराबाबत अविश्वास दर्शविणे, निवडणूक प्रक्रियेविषयी गढूळ वातावरण निर्माण करणे, आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल खुलासा सादर करावा, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रम प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केला आहे. त्यानुसार १० मार्च रोजी आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी गुन्हा ठरणाऱ्या कृती टाळाव्यात, असे आदेश आयोगाने दिले होते.