सर्वांसाठी लोकल सुरू करण्याबाबत १५ डिसेंबरनंतर निर्णय होणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Mumbai_Local_PTcI.jpg)
मुंबई – सर्वांसाठी लोकल कधी सुरु होणार? याची वाट मुंबईकर चाकरमानी पाहत आहे. अशा चाकरमान्यांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 15 डिसेंबरनंतर लोकल सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी याबाबत माहिती दिली आहे.
दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय दिवाळीनंतर घेतला जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार अजून दोन आठवडे कोरोनाचा संसर्ग आणि रुग्णांच्या संख्येवर लक्ष दिले जाणार आहे. त्याचबरोबर बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे आणखी काही दिवस संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवले जाईल. त्यानंतर 15 डिसेंबरच्या पुढे लोकलबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती चहल यांनी दिली आहे.
तसेच ‘राज्य सरकारने आपल्या राज्यात येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे जर कोणाला मुंबई किंवा महाराष्ट्रात यायचे असेल, तर कोरोना चाचणीचा अहवाल दाखवणे बंधनकारक असणार आहे. मुंबईतसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रवासी विमान आणि रेल्वे येत असतात. पालिका प्रशासन त्याची अंमलबजावणी करत आहे. त्यामुळे कोणालाही कोरोना निगेटिव्ह अहवाल नसेल, तर मुंबईत घेतले जाणार नाही’, असेही मुंबई महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
त्याचबरोबर ‘मुंबईत सध्या कोरोनाची स्थिती ही नियंत्रणात आहे. बेड योग्य प्रकारे उपलब्ध आहेत. त्यामुळे कोरोनाची लाट येईल की नाही हे माहीत नाही पण पालिकेने याचे नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे आता लोकांनी जे नियम दिले ते पाळणे गरजेचे असणार आहे’, असेही इक्बालसिंग चहल म्हणाले.