‘सरकारला लाज कशी वाटत नाही’: महाआघाडीची टॅगलाईन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/NCP.jpg)
मुंबई : ‘आश्वासनांची पूर्तता न करता मते मागायला येताना सरकारला लाज कशी वाटत नाही’ या टॅगलाईनच्या माध्यमातून महाआघाडी सरकारला जनतेच्या मनातील प्रश्न विचारणार आहे. काँग्रेस खा.हुसेन दलवाई व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकारपरिषदेत ही दिली.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद आज गांधीभवन येथे पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये महाआघाडीची एकत्रित प्रचार यंत्रणेची आणि प्रचारातील मुद्द्यांची माहिती, तसेच ऑडीओ, व्हिडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधारी भाजप शिवसेनेवर कशापध्दतीने सरकारवर हल्लाबोल केला जाणार आहे याची माहिती काँग्रेस सरचिटणीस अभिजीत सपकाळ यांनी दिली.
खा. दलवाई म्हणाले, मोदी सरकारच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले. चुकीच्या धोरणामुळे सर्वच समाज घटक अडचणीत आले आहेत. मोदींनी गेल्या लोकसभा निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे या निवडणुकीत मते मागायला येण्याच्या आधी मागच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचे काय झाले ते अगोदर सांगा? अशी जनतेची भावना आहे.
नोक-या मागणा-यांना पकोडे तळायला सांगताना लाज कशी वाटत नाही? मुली पळवून नेण्याची भाषा करणा-यांना मते मागायला येताना लाज कशी वाटत नाही? शाळा बंद करून मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणा-या सरकारला पुन्हा मते मागायला येताना लाज कशी वाटत नाही? पंधरा लाखाचे आश्वासन देऊन फसवणूक करणा-यांना मते मागायला येताना लाज कशी वाटत नाही?ऑनलाईनच्या नावाखाली शेतक-यांना कर्जमाफी नाकारणा-या सरकारला मते मागताना लाज कशी वाटत नाही? हे जनतेच्या मनातील प्रश्न महाआघाडी सरकारला विचारणार आहे, असे खा. दलवाई म्हणाले.