‘सत्तेसाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकतात’; अशोक चव्हाणांचा भाजपावर हल्लाबोल
मुंबई | महाईन्यूज
विधानसभा निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचे फोन टॅपिंग केले असल्याची माहिती समोर आलेली होती. याप्रकरणी सरकारकडून चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली आहे. फोन टॅपिंगवरून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपावर निशाणा साधलेला आहे.
‘सत्तेसाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकतात’ असं म्हणत अशोक चव्हाण यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. शुक्रवारी (24 जानेवारी) अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. ‘निरंकूश व अखंड सत्ता हाच भाजपाचा एकमेव अजेंडा आहे. सत्तेसाठी ते कोणत्याही पातळीला जाऊ शकतात, हे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे फोनटॅपिंगच्या आरोपामध्ये तथ्य असण्याची दाट शक्यता असून, मुख्यमंत्र्यांनी सखोल उच्चस्तरीय चौकशी करावी’ असं चव्हाण यांनी म्हटलेलं आहे.