संत डॉ. रामराव महाराजांच्या निधनाने एक महान तपस्वी काळाच्या पडद्याआड गेले: बाळासाहेब थोरात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Sant-Ramrao-Maharaj.jpeg)
मुंबई । प्रतिनिधी
बंजारा समाजाचे धर्मगुरू, पोहरादेवी तीर्थक्षेत्राचे मठाधिपती संत डॉ. रामराव महाराज हे देशभरातील बंजारा बांधवांचे श्रद्धास्थान होते. बंजारा समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी संपूर्णआयुष्य वेचले. आपल्या प्रवचनातून त्यांनी रुढीवादी, अशिक्षित बंजारा समाजामध्ये शिक्षणाप्रती जागृती निर्माण केली, समाजाला नवी दिशा दिली. त्यांच्या निधनाने एक महान तपस्वी काळाच्या पडद्याआड गेले, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.
बंजारा समाजाला व्ही.जे.एन.टी. प्रवर्ग मिळावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. सामाजातील अनिष्ट परंपरा बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. बालविवाह होऊ नयेत यासाठी त्यांनी समाजात मोठ्या प्रमाणात जागृती केली, व्यसन मुक्तीसाठी त्यांनी मोठे कार्य केले. संत रामराव महाराज यांच्या कार्याची दखल घेत कर्नाटकमधील गुलबर्गा विद्यापिठाने त्यांना डि. लिट पदवी देऊन सन्मानित केले होते.
रामराव महाराज या थोर संताच्या जाण्याने बंजारा समाजाची मोठी हानी झाली आहे अशा भावना व्यक्त करुन डॉ. रामराव महाराज यांना बाळासाहेब थोरात यांनी श्रद्धांजली अर्पण केली.