‘रिपब्लिक’ चॅनेलच्या अर्णब गोस्वामींना अटक करा, बनावट टीआरपी प्रकरणी शिवसेना आक्रमक
मुंबई | पैसे वाटून बनावट टीआरपी वाढवण्याऱ्या ‘रिपब्लिक’ चॅनेलच्या अर्णब गोस्वामी यांना अटक करा, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन रॅकेटचा पर्दाफाश केला.
“सत्यमेव जयते! ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स टीव्ही’च्या चालकांप्रमाणेच लोकांना पैसे देऊन बनावट टीआरपी वाढवण्याऱ्या ‘रिपब्लिक’ चॅनेलच्या अर्णब गोस्वामी यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी मी मुंबईचे पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांच्याकडे करतो.” असे ट्वीट प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
याआधी, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘असत्यमेव जयते’ म्हणत रिपब्लिक वाहिनीला टोला लगावला होता. टेलिव्हिजन चॅनेल्सच्या टीआरपीमध्ये फेरफार करणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. बीएआरसी आणि हंसा या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून हे रॅकेट चालवण्यात येत होते. या माध्यमातून फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या वाहिन्यांना अवैधरित्या वाढीव टीआरपीचा लाभ मिळाला होता, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली.
याप्रकरणी फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या चालकांना अटक करण्यात आली आहे. तर रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठीही रॅकेट चालवणाऱ्यांकडून मदत घेण्यात आल्याची माहितीही समोर आल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले. त्यामुळे आता रिपब्लिक टीव्हीच्या प्रवर्तकांची चौकशी करण्यात येईल.