राहूल गांधी पंतप्रधान म्हणून पवारांना चालतील का? ते आधी विचारा – विनोद तावडे
मुंबई : राहुल गांधी पंतप्रधान म्हणून चालतील का? हे आधी शरद पवार यांना विचारून घ्या, नाहीतर तुमच्या पुढील स्क्रिप्ट बंद होतील,’ असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हाणला आहे.
मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेला विनोद तावडे यांनी यावेळी उत्तर दिले. ‘हा सव्वाशे कोटी लोकसंख्येचा देश आहे. हा काही खेळ नाही. खड्ड्यात जायला तो काय मनसे पक्ष आहे का’, असा उपरोधिक सवाल विनोद तावडे यांनी केला. तसेच, ‘राहुल गांधी पंतप्रधान म्हणून चालतील का? हे आधी शरद पवार यांना विचारून घ्या, नाहीतर तुमच्या पुढील स्क्रिप्ट बंद होतील,’ असा टोला लगावला.
याचबरोबर, स्वतःचे इंजिन बंद पडले आणि हे दुसऱ्यांना मदत करत आहेत अशी टीका विनोद तावडेंनी केली आहे. शिवाय, जे निरुपम राज ठाकरे यांना लुख्खा म्हणाले होते, तेच आता मनसैनिकाना सांगणार निरुपम यांना मतदान करा. हा तर मनसैनिकांवर होणारा अन्याय असल्याचे विनोद तावडे यावेळी म्हणाले.
‘बाळासाहेबांचा आदर्श घेऊन चालणाऱ्याने हा नको म्हणून त्याला निवडून द्या हे सांगण बरोबर नाही. एवढाच अभ्यास पक्षासाठी केला असता तर फायदा झाला असता. आधी कष्ट घेतले असते तर दुसऱ्याला मदत करायची वेळ आली नसती’, असा टोलाही विनोद तावडे यांनी राज ठाकरेंना लगावला.