राष्ट्रवादीचे 13 ते 20 आॅक्टोबर सरकारविरोधात राज्यभर निषेध मोर्चे
मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थिती, लोडशेडिंग, पेट्रोल-डिझेलचे दिवसागणिक वाढणारे भाव आणि महागाई याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मैदानात उतरला आहे. राज्यभर पक्षाकडून १५ ते २० ऑक्टोबरला निषेध मोर्चे काढण्यात येणार आहेत. याशिवाय या मोर्चाने सरकारला जाग आली नाही तर मंत्र्यांच्या गाडया अडवून घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी दिली.
केंद्र आणि राज्यात असलेल्या भाजप-शिवसेना सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आठवडाभर तहसिल आणि उपविभागीय कार्यालयावर निषेध मोर्चे काढण्यात येणार आहेत. या निषेध मोर्चाने सरकारला जाग आली नाही तर मंत्र्यांच्या गाडया अडवून त्यांना घेराव घालून जाब विचारला जाणार आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ, अनियमित वीजपुरवठा, वाढलेली महागाई, बेरोजगारी आणि दुष्काळ यामुळे सर्वसामान्य जनता पुरती हैराण झाली आहे. मात्र हे सरकार या गोष्टींवर गंभीर नाही, त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर निषेध मोर्चा आयोजित केला आहे. १५ ते २० ऑक्टोबरला निषेध मोर्चा काढतानाच उपविभागीय अधिकारी किंवा तहसिलदारांना या समस्यांचे निवेदनही दिले जाणार आहे, असेही प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सांगितले.