राष्ट्रपुरुषांच्या यादीत सावरकरांना स्थान देण्याचा भाजपाला विसर…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-221.png)
मुंबई | महाईन्यूज |
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न किताब देऊन त्यांच्या स्वातंत्र्यलढय़ातील योगदानाचा यथोचित गौरव करावा, अशी मागणी केली जात आहे, मात्र राज्य सरकारकडून वेळोवेळी जाहीर करण्यात येणाऱ्या राष्ट्रपुरुषांच्या यादीतही अजून त्यांना स्थान मिळालेले नाही. विशेष म्हणजे सावरकरांच्या गौरवाचा ठराव मांडावा म्हणून आघाडी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या आणि गेली पाच वर्षे सत्ता भोगलेल्या भाजपलाही त्यांचा राष्ट्रपुरुषांच्या यादीत समावेश करण्याचा विसर पडला हे देखील तितकेच खंर आहे…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Capture-69.png)
भाजप-शिवसेनेची युती असताना दोन्ही पक्ष सावरकर यांना भारतरत्न किताब देण्याची मागणी करीत होते. शिवसेनेने आता भाजपशी फारकत घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून सत्ता ताब्यात घेतली आहे.
काँग्रेसचा सावरकरांना विरोध आहे, हे जगजाहीर आहे. अशा पक्षाबरोबर युती करणाऱ्या शिवसेनेची कोंडी करण्याची खेळी भाजपने केली. सावरकर यांची बुधवारी २६ फेब्रुवारीला पुण्यतिथी होती. त्याचे औचित्य साधून भाजपने विधिमंडळात सावरकर यांच्या गौरवाचा ठराव मांडावा तसेच तो मंजूर करावा, अशी मागणी करून आघाडी सरकारमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या या मागणीवरून दोन्ही सभागृहांमध्ये बराच गोंधळ झाला. सत्ताधारी आघाडीने ठराव तर मांडला नाहीच, परंतु गोंधळातही दिवसभराचे कामकाज उरकून घेऊन, भाजपलाही चांगलाच धक्का दिला.