राज ठाकरेंच्या कुंचल्याचे ‘जलयुक्त शिव्या’र वर फटकारे
मुंबई – ‘जलयुक्त शिवार’ योजना फुसका बार ठरल्याचे दर्शवत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर व्यंगचित्रातून निशाणा साधला आहे. आकड्यांचे खेळ मांडणारया सरकारने १ लाख २५ हजार खोट्या विहीरी बांधल्या असून महाराष्ट्रातील संतापलेला, तहानलेला सर्वसामान्य माणूस सरकारला शिव्याशाप देत आहे. त्यामुळे सरकारची ही योजना “जलयुक्त ‘शिव्या’र” योजना ठरल्याचे व्यंग राजनी केले आहे.
व्यंगचित्रात एका कोरड्या विहीरीमध्ये महाराष्ट्रातील जनता दाखवण्यात आली आहे. यातील नागरिक ‘संतापलेला’ आणि ‘तहानलेला’ दाखवण्यात आला असून सरकारला शिव्या देत संताप व्यक्त करत असल्याचे दर्शवण्यात आले आहे. या कोरड्या विहीरीच्या कडेला चिंताग्रस्त हावभावांमध्ये मुख्यमंत्री आणि त्यांच्या बाजूला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार दाखवण्यात आले आहेत. राज्यातील पीकस्थिती भीषण असल्याचं वास्तव मान्य करत दुष्काळ जाहीर करण्यासाठी डिसेंबर महिना उजाडणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्पष्ट केले. केंद्राने ठरवून दिलेले निकष पूर्ण करण्यासाठी वेळ लागणार असल्याचं सांगताना टंचाईची स्थिती महिना अखेर जाहीर केली जाईल, असेही ते म्हणाले. सोमवारी अमरावती जिल्ह्यातील विविध योजनांच्या यशापयशाचा आढावा घेताना ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर सायंकाळी राज यांनी आपल्या व्यंगचित्रातून मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.