राज्यातील 9 शहरे देशात सर्वात हॉट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/sun-weather.jpg)
मुंबई – राज्यात बुधवारपासून आलेली उष्णतेची लाट शुक्रवारी आणखी तीव्र झाली. कोकण वगळता राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत शुक्रवारी पारा ४० अंशांवर राहिला. गेल्या तीन दिवसांपासून जगातील हॉटस्पॉट बनलेल्या अकोल्यात शुक्रवारी राज्यातील सर्वाधिक ४६.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. शुक्रवारी देशातील १० सर्वात उष्ण शहरांत महाराष्ट्रातील ६ शहरांचा समावेश होता. महाराष्ट्रासह देशांतील विविध राज्यांत येत्या आठ मेपर्यंत उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे.
आयएमडी आणि पुणे वेधशाळेच्या अहवालानुसार, शुक्रवारी राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसची वाढ दिसून आली. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून २९ एप्रिलपर्यंत ही लाट कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, ओडिशा आणि दक्षिण उत्तर प्रदेशात येत्या ८ मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहील.
औरंगाबादेत २०१० नंतर एप्रिलमध्ये प्रथमच पारा ४३
उष्णतेच्या लाटेचा फटका औरंगाबादकरांना बसतो आहे. औरंगाबादेत १७ एप्रिल २०१० रोजी ४३.५ अंश अशी एप्रिलमधील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. आठ वर्षांनंतर २६ एप्रिल २०१९ रोजी तापमान ४३ अंश नोंदले गेले. २०११ ते २०१८ या काळात एप्रिलमध्ये पारा सातत्याने ४२ अंशांच्या खाली राहिला.
देशातील सर्वात उष्ण शहरांत राज्यातील ९ शहरे
शुक्रवारच्या तापमानाचा विचार करता, देशातील सर्वात उष्ण १० शहरांत राज्यातील सहा शहरांचा समावेश होता. देशात ४६.५ अंश तापमानासह मध्य प्रदेशातील खरगोन सर्वात उष्ण शहर राहिले. त्यानंतर अकोला, वर्धा, चंद्रपूर, परभणी, ब्रह्मपुरी, अमरावती, परभणी, नागपूर, अहमदनगर ही शहरे देशात सर्वाधिक उष्ण राहिली.
प्रमुख शहरांचे तापमान
अहमदनगर ४४.९, अकोला ४६.४, अमरावती ४५.४, औरंगाबाद ४३, बीड ४४.२, बुलडाणा ४३.१, चंद्रपूर ४५.६, जळगाव ४४.४, मालेगाव ४३.१, नागपूर ४५.२, नांदेड ४४.२, नाशिक ४१.७, उस्मानाबाद ४३.८, परभणी ४५.७, पुणे ४२.६, सोलापूर ४४.३, वर्धा ४५.७, यवतमाळ ४४.५ अंश सेल्सियस.