राज्यपाल गोव्यात मजा मारायला गेले, शेतकऱ्यांनी निवेदन फाडलं; उद्या तिरंग्याला वंदन करुन मोर्चा परतणार
![The governor went to Goa to have fun, the farmers tore the statement; The morcha will return tomorrow after paying homage to the tricolor](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/farmers-protest-mumbai.png)
मुंबई – कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हजारो शेतकरी आज मुंबईच्या आझाद मैदानात आले होते. राज्यपालांना निवेदन सादर करण्यासाठी मोर्चा राजभवनाकडे जात असताना त्यांना मेट्रो सिनेमाजवळ अडवण्यात आलं. त्यानंतर राज्यपाल मुंबईत नसल्याचे समोर आल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. राज्यपालांच्या या कृतीचा निषेध करत संयुक्त मोर्चाच्या वतीनं राजभवनावर जाण्याचा निर्णय रद्द करत राज्यपालांना देण्यात येणारं निवेदन फाडून टाकण्यात आलं.
वाचा :-शेतकऱ्यांचा सातबारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव- बाळासाहेब थोरात
यावर आपली भूमिका स्पष्ट करताना अशोक ढवळे म्हणाले की, राज्यपालांनी स्वत: वेळ दिली होती. त्यांनी स्वत: दिलेल्या भेटीनंतर पळून गेले. गोव्यात राज्यपाल मजा मारायला गेले. राज्यपालांची ही कृती महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. श्रमिक, कष्टकरी, कामगारांचा हा अवमान राज्यपालांनी केला आहे. राज्यपाल भाजपचे पुढारी होते. ते आरएसएसचे प्रचारक अजूनही आहेत, त्यामुळं आम्हाला आश्चर्य वाटत नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत. राज्यपाल गोव्याला निघून गेलेत. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, असा आरोप त्यांनी केला.
त्यांनी सांगितलं की, राज्यपाल नाहीत तर ते सचिवांना निवेदन देणार नाहीत असं ठरवलं आहे. राज्यपालांच्या निषेधार्थ त्यांना आपण देणार असलेलं निवेदन याच स्टेजवरुन फाडून टाकणार. राज्यपालांच्या या कृतीला निषेध म्हणून हे निवेदन आम्ही फाडत आहोत. हे निवेदन राष्ट्रपतींना पाठवणार आहोत. आपण आज खूप चांगल्या रितीने आंदोलन केलं. आज एकजुटीनं आणि ताकतीनं आपण मोर्चा काढला. उद्या प्रजासत्ताक दिन आहे. हा आपला दिवस आहे. आजचा मोर्चा केंद्र सरकारच्या विरोधातला मोर्चा आहे. अंबानी, अदानीची उत्पादनं वापरु नका. शांततेत आपण आझाद मैदानात जायचं आहे. उद्या 26 जानेवारीला तिरंग्याला वंदन करुन आपण घरी जायचं आहे, असं ढवळे म्हणाले.
आपल्या मागण्या घेऊन राजभवनाकडे निघालेल्या शेतकऱ्यांना मुंबईत मेट्रो सिनेमा चौकात अडवलं आहे. राज्यपालांना भेटण्यासाठी शेतकरी आंदोलक आणि काँग्रेस नेते आक्रमक झालेले पाहायला मिळालं. राज्यपालांशी भेट झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही, असं अजित नवले यांनी सांगितलं आहे. दरम्यान शिष्टमंडळाला पोलिसांच्या गाडीत बसवून घेऊन जात असल्याचं देखील समोर आलं आहे. या शिष्टमंडळात सचिन सावंत, भाई जगताप, चरणसिंह सप्रा, मेधा पाटकर, अशोक ढवळे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.