‘या’ दोन निर्णयांबद्दल फडणवीसांनी केलं उद्धव ठाकरेंचं जाहीर अभिनंदन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/5-17.jpg)
मुंबई – शिवसेनेनं राष्ट्रवादी व काँग्रेसला सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापल्यानंतर विरोधी बाकांवर बसावं लागलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपले जुने मित्र उद्धव ठाकरे यांचं जाहीररित्या अभिनंदन केलं.
राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या सरकारच्या चहापानावर विरोधी पक्ष भाजपनं बहिष्कार घातला. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी विरोधी पक्षाची भूमिका मांडली. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर त्यांनी आसूड ओढले. मात्र, उद्धव ठाकरे यांचे दोन गोष्टींसाठी अभिनंदन केले.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) पाठिंबा व एल्गार परिषद प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडं (एनआयए) सोपवण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या निर्णयासंदर्भात ते बोलत होते. या दोन्ही निर्णयासाठी उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन करतो, असं ते म्हणाले. ‘कोरेगाव-भीमा आणि एल्गार हे वेगळं नाही, हेच आतापर्यंतच्या तपासात पुढं आलं आहे. तपासाची व्याप्ती आता वाढली असल्याने तो केंद्र सरकारकडे जाणेच योग्य आहे,’ असंही ते म्हणाले.