मेट्रो कारशेडसाठी दिलेली कांजूरची जागा कोर्ट कचेरीत अडकली आहे, भाजप नेत्याचा आरोप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/अतुल-भातखळकर.jpg)
मुंबई – मेट्रो 3 प्रकल्पाचे कारशेड कंजूरमार्ग येथे हलवल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घोषित केले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयावर कांदिवली पूर्वचे भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी घणाघाती टीका केली आहे.
“मेट्रो कार शेड कांजूरला नेण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा फसवी आहे. कारण ही जमीन कोर्टकज्ज्यात अडकलेली आहे. मुंबईत कारशेडसाठी फक्त आरेची जमीन उपयुक्त असल्याचा तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल असताना ही उठाठेव कशाला?” असा सवाल त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र-मुंबईतील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी त्यांना आठवण करुन देऊ इच्छितो की, त्यांच्या सरकारने नियुक्त केलेल्या समितीनेच मेट्रो प्रकल्पासाठी कारशेड आरे कॉलनीच्या जागेवरच होऊ शकते असे म्हटले होते, त्याशिवाय आमच्या सरकारच्या काळात नियुक्त केलेल्या समितीने सुद्धा कारशेडसाठी आरे कॉलनीची निवड केली होती” असे अतुल भातखळकर म्हणाले.
“कांजूरमार्गची जमीन चांगली नसून, ती कोर्टकचेरीत फसलेली आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जनतेशी खोटं बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत” असे भातखळकर म्हणाले. “मेट्रो कारशेडच्या कामाला मागच्या नऊ महिन्यापासून स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे मुंबई-महाराष्ट्रातील जनतेचे दिवसाला पाच कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. अशी खोटी विधाने केल्याबद्दल मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध करतो” असे अतुल भातखळकर म्हणाले.