मृत मजूरांना देशभरातील नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामूळे अनेक मजूर, विद्यार्थी वेगवेगळ्या राज्यांत अडकले आहेत. त्यांच्या परतीची व्यवस्था केंद्र सरकारने विशेष ट्रेन सोडत केली आहे. मात्र, आज (८ मे) पहाटे काही मजूर पायी गावी जात होते आणि आरामासाठी रेल्वे रुळावर झोपले असता मालवाहू गाडीच्या खाली चिरडून १६ जणांना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या मृत मजूरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जाहीर केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही मृतांच्या कुटुंबाला ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या मजूरांना अनेक नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पीयुष गोयल यां सगळ्यांनी ट्वीट करत मृत मजुरांना श्रद्धांजली वाहिली आहे.