मुंबई विभागात ११ महिन्यांत ४४ मेंदूमृतांचे अवयवदान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/AVAY-DAN.jpg)
- जनजागृती, प्रोत्साहनाची गरज कायम
अवयवदानाविषयी विविध माध्यमांतून जनजागृती केली जात असली तरी अवयवदानाला आणखी प्रोत्साहन देण्याची गरज अजूनही आहे, असे मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. शहरात जानेवारी २०१८ ते २२ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत ४४ मेंदूमृत रुग्णांचे अवयवदान करण्यात आले, तर ५० रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयवदानासाठी संमती दिल्याचे आकडेवारीतून निदर्शनास आले आहे.
समितीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या ११ महिन्यांत शहरातून मेंदूमृत रुग्णांचे १२७ अवयव प्राप्त झाले असून यात मूत्रपिंड ६७, यकृत ३९, हृदय १६ आणि पाच फुप्फुसांचा समावेश आहे.
या काळात मुंबईत १३४ अवयवांचे प्रत्यारोपण केले गेले. यात मूत्रपिंड ६९, यकृत ४१, हृदय १८, हृदय आणि फुप्फुस एकत्रित तीन, फुप्फुस एक असल्याची माहिती समितीने दिली.
मुंबईमधून प्राप्त झालेल्या अवयवांचे प्रत्यारोपण करण्यासाठी रुग्ण उपलब्ध नसल्यास राज्यातील इतर समित्यांना विचारणा केली जाते. तेथेही उपलब्ध नसल्यास विभागीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेला (रोटो) कळविण्यात येते. यात समाविष्ट असलेल्या राज्यांमध्ये आवश्यकता नसल्यास राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेला (नोटो) सांगण्यात येते.
या अवयवांच्या देवाणघेवाणीमध्ये चेन्नईला दोन हृदये, दोन फुप्फुसे, पुणे आणि दिल्लीला प्रत्येकी एक हृदय प्रत्योरापणासाठी शहरातून पाठविण्यात आले. सुरतमधून तीन हृदये, पुण्यातून तीन हृदये, गोव्यातून दोन मूत्रपिंडे आणि एक यकृत, एक हृदय मुंबईत प्रत्यारोपणासाठी आणले गेले.
लोकांची मानसिकता अद्याप बदलेली नाही. धार्मिक रूढी, परंपरा यामुळे लोक अवयवदानासाठी तयार होत नाहीत. मानसिकता बदलण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. अनेकदा रुग्णांचे दूरचे नातेवाईक तयार असतात; परंतु जवळचे नातेवाईक म्हणजे आई-वडील, नवरा-बायको, मुलगा नकार देतात. डॉक्टर आणि रुग्णालयांबाबत नकारात्मक चित्र असल्यानेही नातेवाईक अवयवदानासाठी पुढे येत नाहीत.
– डॉ. हर्षद पुरंदरे, मेंदू शल्यचिकित्सक, ज्युपिटर रुग्णालय