मुंबई महानगरपालिकेकडून भिवंडी शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये 20 टक्के पाणी कपात
मुंबई महानगरपालिकेकडून भिवंडी शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये बुधवारपासून म्हणजे आजपासून २० टक्के पाणी कपात करण्यात आलं आहे. त्यामुळे भिवंडी शहरात ज्या भागात मुंबई महापालिकेकडून पाणीपुरवठा होतो, त्या भागात पुढील सूचनेपर्यंत कमी प्रमाणात आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.तसेच नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावं, असं आवाहन भिवंडी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण गायकवाड यांनी केलं आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून ४० दशलक्ष लिटर, स्टेम पाणीपुरवठा प्राधिकरणाकडून ७३ दशलक्ष लिटर आणि भिवंडी महापालिकेच्या वराला तलावातून २ दशलक्ष असा एकूण ११५ दशलक्ष प्रतिदिन पाणीपुरवठा शहराला होत असतो. मात्र यंदा सरासरीपेक्षा अत्यंत कमी पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत तलावांमध्ये अल्प प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे.
पाण्याच्या साठ्याचा आढावा घेऊन त्यानुसार २० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून घेण्यात आला. २० टक्के पाणी कपात अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना होत असलेल्या पाणीपुरवठ्यालादेखील लागू केली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेकडून भिवंडीला होत असलेल्या पाणीपुरवठ्यात २० टक्के पाणी कपात लागू केली असल्याची माहिती भिवंडी पालिकेकडून देण्यात आली.