मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील वीज प्रवाह खंडित ! कार्यालये आणि रेल्वे वाहतूक ठप्प
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Light_bulb-gayab.jpg)
मुंबई – मुंबईसह उपनगर, नवी मुंबई, ठाण्यातील अनेक भागात वीज प्रवाह अचानकपणे खंडित झाला आहे. मुंबईतील लालबाग, परळ, अंधेरी, दादर, ठाणे, वडाळा या भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तसेच ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, पनवेल या महानगर पालिका क्षेत्रातही वीज गायब झाली आहे. सोशल मीडियावर वीज गेल्याबाबत अनेकांनी माहिती देणारे ट्वीट केले आहेत.
दरम्यान, टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात (पॉवर ग्रीड) बिघाड झाल्याने वीज गेल्याची माहिती ‘बेस्ट’ने दिली आहे. या संदर्भात ‘बेस्ट’ने ट्वीट केले आहे. वीज पुरवठ्यातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र वीज गेल्याने मुंबईतील अनेक सेवांवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
मुंबईत इतक्या मोठ्याप्रमाणावर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ट्रेनमध्ये अडकून पडले आहेत. ट्रेनमधील पंखे आणि लाईटही बंद झाले आहेत. याशिवाय, रस्त्यावरील सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणाही पूर्णपणे बंद पडली आहे.
तसेच यामुळे सर्व भागांतील रुग्णालये आणि कोरोना केंद्रातील वीजपुरवठाही खंडित झाला आहे. वीजपुरवठा लवकर पूर्ववत न झाल्यास व्हेटिंलेटवर व इतर अत्यावश्यक उपचारांसाठी लागणारी यंत्रणा ठप्प होण्याचा धोका आहे. त्यामुळे हा वीजपुरवठा कधी सुरळीत होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच दुसरीकडे ऑनलाईन परीक्षांनाही याचा फटका बसला आहे. काही विद्यार्थ्यांना अंधारात, तसेच प्रचंड उकाड्यात पेपर द्यावा लागत आहे.