मुंबई, ठाण्यातील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता : ऊर्जामंत्री
![Kendracha Economy Energy Fields Frustrating Disappointment - Energy Minister Dr. Nitin Raut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Nitin-Raut.jpg)
मुंबईसह उपनगरांतील बत्ती गुल होण्यामागे घातपाताची शक्यता असल्याचा संशय राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे. गेल्या सोमवारी (दि. १२) मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे. याबाबत राऊत यांनी ट्विट केले आहे.
गेल्या सोमवारी मुंबई, ठाण्यातील वीज पुरवठा खंडित झाल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती. ऑनलाईन परीक्षांचा गोंधळ उडाला. रुग्णालयेही जनरेटरवर सुरू करावी लागली होती.
मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यात बिघाड झाल्यामुळे सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता. तथापि, युद्धपातळीवर तीन साडेतीन तासांत बहुतांश वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
दरम्यान, वीज पुरवठा खंडित झालेल्या घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे तसेच यापुढे याची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.
महापारेषणच्या ४०० किलो कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट-१ ची देखभाल-दुरुस्ती सुरू असताना सर्व भार सर्किट २ वर होता. मात्र सर्किट २ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणेमधील बहुतांश भागात याचा फटका बसला. कळवा ते पडघे या मार्गावरील विद्यूत वाहिन्यांवर मल्टिपल ट्रीपिंग झाले असून टाटा पॉवरकडून येणाऱ्या वीज पुरवठ्यावर हे ट्रीपिंग आहे. त्यामुळे ३८० मेगावट वीज पुरवठ्याला फटका बसला. डहाणूकडून येणाऱ्या विद्यूत वाहिन्यांना याचा फटका बसला.