मुंबई कुण्या एकट्याच्या बापाची जहागिरी नाही : रामदास आठवले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Ramdas-Athavle.jpg)
मुंबई | “महिला म्हणून कंगनाला संरक्षण देणं आमची नैतिक जबाबदारी आहे. मुंबईने अनेकांना जगवलं आहे. मुंबई काही कुण्या एकट्याच्या बापाची जहागिरी नाही”, असं म्हणत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिनेत्री कंगना रनौतचं समर्थन केलं आहे.
मुख्यमंत्र्याबद्दल एकेरी शब्दात उल्लेख ती चिडली असल्यामुळं केला. पण, असा एकेरी उल्लेख करणं योग्य नाही. शिवसेना आणि अनेक पार्टीची कार्यालयं अवैध आहेत. ती तुम्ही तोडणार आहात का? मुख्यमंत्रांबद्दल बोलताना आदरपूर्वक बोललं पाहिजे. अशा प्रकारे सूडबुद्धीने कारवाई करणं योग्य नाही. 52 हजार कामं मुंबईत अवैध आहेत, ती तुम्ही तोडणार आहात का?”, असा प्रश्नही रामदास आठवले यांनी उपस्थित केला.
“कंगनाचं ऑफिस तोडायला नको होतं. याआधी का तिच्यावर कारवाई केली नव्हती? शरद पवारांच्या काळात बांधकाम झालं याबाबद्दल मला माहित नाही. तिला माहित असेल म्हणून ती बोलली असेल. दाऊदची इमारत देखील अवैध असल्याचं सांगितलं. मग ती का तोडत नाहीत? तिच्या घराला हात लागता कामा नये”, असंही रामदास आठवले म्हणाले.