मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या नटीला भाजपचा पाठिंबा मिळणं अत्यंत दुर्दैवी- सामना
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या मुंबई संदर्भातील वक्तव्यामुळे शिवसेना आणि कंगनामधील शाब्दिक चकमक अधिकचं तीव्र होताना दिसून येत आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा कंगना तसेच भाजपवर निशाणा साधलेला आहे. यापूर्वी लिहिलेल्या अग्रलेखात शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करत कंगनाला सुनावलेलं होतं. तसेच यावेळी सामनाच्या अग्रलेखातून कंगनाची पाठराखण करणाऱ्या भाजप पक्षावर टीकास्त्र डागलेल आहे.
मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या, मुंबईचा अपमान करणाऱ्या नटीच्या मागे भाजपा उभा राहतो, हे दुर्दैवी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. एक नटी मुंबईत बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याविरुद्ध एकेरी भाषा बोलते. आव्हानाची भाषा करते व त्यावर महाराष्ट्राच्या जनतेने काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही हे कसले एकतर्फी स्वातंत्र्य? तिच्या बेकायदेशीर बांधकामावर हातोडा पडला तेव्हा हे तर माझे राम मंदिरच होते असा कांगावाही तिने केला होता. पण हे बेकायदेशीर बांधकाम तिने कायद्याचे उल्लंघन करुन ती सांगत असलेल्या पाकिस्तानात बांधले होते. मुंबईला ‘पाकिस्तान’ म्हणायचे व या ‘पाकिस्ताना’तल्या बेकायदेशीर कामांवर सर्जिक स्ट्राईक केला की छाती पिटायची, हा कसला खेळ? असा सवालदेखील संजय राऊत यांनी केलेला आहे.
संपूर्ण नव्हे, निदान अर्ध्या हिंदी सिनेसृष्टीने तरी मुंबईच्या अवमानासंदर्भात व्यक्त व्हायलाच हवे होते. कंगनाचे मत हे संपूर्ण सिनेसृष्टीचे मत नाही, असे सांगायला हवे होते. निदान अक्षय कुमार वगैरे मोठ्या कलावंतांनी तरी समोर यायला हवं होते. मुंबईने त्यांनाही दिलेच आहे. जगभरातील श्रीमंतांची घरे मुंबईत आहेत. मुंबईचा अवमान होत असताना ते सगळेच खाली मान घालून बसतात. मुंबईचे महत्त्व फक्त ओरबडण्यासाठी व पैसे कमावण्यासाठीच आहे. मग मुंबईवर कोणी रोज बलात्कार केला तरी चालेल. या सगळ्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे, ‘ठाकरे’ यांच्या हाती महाराष्ट्राची सूत्रे आहेत. त्यामुळे रस्त्यावर उतरुन अस्मितेसाठी राडे करण्याची आज गरज नाही. महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे भाग्यचक्र मुंबईभोवतीच फिरत आहे. मुंबई देशाची असेल नाहीतर जगाची, पण तिच्यावर पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे. मुंबई महाराष्ट्राच्या बापाची आहे, असं रोखठोक मतही राऊत यांनी अग्रलेखात मांडलेल आहे.