मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस, दुपारी हाय टाईडचा इशारा; रेड अलर्ट जारी
मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील विविध भागात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत शहरात 230.06 मिमी, मुंबई पूर्व उपनगरात 162.83 मिमी, मुंबई पश्चिम उपनगरात 162.28 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर पुढील 24 तासात मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन पालिकेतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे. दरम्यान, पावसामुळे अनेक ठिकाणची रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीच आहे. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली पश्चिम रेल्वे वाहतूकही ठप्प असून मध्य रेल्वे धीम्या गतीने सुरूआहे. तर हार्बर रेल्वेची कुर्ला ते सीएसएमटी रेल्वे वाहतूक बंद आहे.
मुंबईत वरळी, धारावी, दादर, मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, चेंबूर, गोरेगाव, अंधेरी या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पावसामुळे कुर्ला, भायखळा, गोरेगाव, किंग सर्कल, करी रोड, कांदिवली, चारकोप परिसरातील सखल भागात पाणी भरल्याचे पाहायला मिळत आहे. गोरेगावमध्ये मोतीलाल नगरात रहिवाशांच्या घरात पाणी शिरले आहे. तर अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी आज बंद ठेवण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय हवामान विभागामार्फत मुंबई शहर आणि उपनगरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन आपत्कालीन विभागाने केले आहे. तसेच पालिकेने काही यंत्रणाही तैनात केल्या आहेत.