मुंबईतील रुग्णवाढ थांबली, तरच मुंबई लोकल पुन्हा सर्वसामान्य नागरिकांसाठीही सुरु करणार : इक्बाल चहल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/local-train-1.jpg)
मुंबई : मुंबईची ‘लाईफलाईन’ फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच नाही, तर सर्वसामान्य प्रवाशांसाठीही सुरु केली जावी, अशी मागणी वारंवार केली जात आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी मुंबई लोकल पुन्हा खुली करण्याची महत्त्वाची अट स्पष्ट केली आहे.
मुंबईतील रुग्णवाढ थांबली, तरच मुंबई लोकल पुन्हा सर्वसामान्य नागरिकांसाठीही सुरु करणार, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी केलं आहे. मुंबईतील रुग्णसंख्या एक टक्क्यावर आली, तरच मुंबई अनलॉक होईल, असं चहल म्हणाले.
मुंबई शहरात नोकरी करणारे बहुसंख्य कर्मचारी मुंबईतील उपनगरे किंवा वसई-विरार, ठाणे, कल्याण-डोंबिवली अशा एमएमआर भागात राहतात. मात्र मुंबईसोबतच या भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मुंबईच्या महानगरी क्षेत्रातील रुग्णवाढ थांबवणे गरजेचे आहे, अन्यथा संसर्ग वाढत राहील, असेही इक्बाल चहल म्हणाले.
मुंबई लोकल येत्या ऑगस्टपासून सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. केंद्र सरकार याबाबत विचार करेल, हा विषय राज्य सरकारच्या अंतर्गत नाही, असे अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं होतं.
मुंबई लोकल 15 जूनपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा सुरु करण्यात आली. मात्र सर्वसामान्य प्रवाशांना यातून प्रवासाची मुभा अद्याप देण्यात आलेली नाही.