मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं मुंबईतील 70 टक्के कोविड सेंटर बंद
मुंबई महापालिका आणि राज्याच्या आरोग्य यंत्रणेच्या अथक परिश्रमामुळे अखेर मुंबईतील कोरोनाचं प्रमाण नियंत्रणात आलं आहे. मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं मुंबईतील ७० टक्के कोविड सेंटर बंद करण्यात आले आहेत. महापालिकेने कोविड सेंटरसाठी घेतलेले लॉज, हॉटेल्स आणि खासगी इमारतीतील खोल्या पुन्हा संबंधितांना परत केल्या आहेत. त्यामुळे येत्या दोन-तीन महिन्यात मुंबईतून कोरोनाचं प्रमाण पूर्णपणे नष्ट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
१ एप्रिल रोजी तत्कालीन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी इमारती आणि छोट्या घरांमध्ये कोरोनाचे रुग्ण अधिक वाढल्याचं सांगितलं होतं. सार्वजनिक शौचालय असल्यामुळे हा प्रादुर्भाव वाढत असल्याने या रुग्णांना क्वॉरंटाइन करण्याची गरज परदेशी यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार मुंबई महापालिकेने मुंबईतील रिकाम्या इमारती, हॉटेल्स, लॉज, लग्नाचे हॉल, स्पोर्ट्स कॉम्पलेक्स आणि मोकळी मैदाने ताब्यात घेऊन त्या ठिकाणी क्वॉरंटाइन सेंटर उभारून संशयितांना या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले होते. गेल्याच आठवड्यात पालिकेचे आयुक्त आय. एस. चहल यांनी नॉन स्लम विभागातून ८० टक्के नवे रुग्ण सापडले असल्याचंही सांगितलं होतं.
काही महिन्यांपूर्वी मुंबईत कोरोनाचे प्रचंड रुग्ण सापडत होते. विशेष करून झोपडपट्टीतून सापडणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. त्यामुळे क्वॉरंटाइन सेंटरची मोठ्या प्रमाणावर गरज होती. झोपडपट्ट्यांमध्ये दाटीवाटीने राहणाऱ्या लोकांना स्वत:च्या घरातच क्वॉरंटाइन होण्यास सांगणं योग्य नव्हतं. जागेच्या अभावी त्यांना ते शक्यही नव्हतं. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी त्यांना क्वॉरंटाइन सेंटरमध्ये हलवणेच योग्य होतं. मात्र, झोपडपट्ट्यामंधील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाल्याने आता कोविड सेंटरची गरज उरली नाही, असं पालिकेच्या आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितलं.