महावीरनगर स्थानक खाडीवरून रोपवेने जोडणार; पाचशे कोटी रुपये खर्च येणार
मुंबई : दहिसर पश्चिम ते डी.एन.नगर या मेट्रो-२ ए मार्गिकेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थेट गोराईला जाता येणार आहे. मेट्रो-२ ए या मेट्रो मार्गिकेवरील महावीर नगर मेट्रो स्थानक येथून गोराईकडे जाण्यासाठी खाडीवरून रोपवे सुरू करण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) आहे. या रोपवेच्या मार्गावर दररोज चार ते पाच हजार प्रवासी प्रवास करतील,असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
एमएमआरडीएने यापुर्वी चारकोप ते मार्वे गाव असा ३.६ किमीचा रोपवे सुरू करण्याची योजना बनवली होती, मात्र काही कारणास्तव ही योजना बारगळली. महावीर नगर स्थानक ते गोराई या रोपवेसाठी पाचशे कोटी रूपये खर्च येणार आहे. या रोपवे मार्गावर आठ स्थानके असणार आहेत. ही ठिकाणे अद्याप निश्चित व्हायची आहेत. रोपवेच्या कामासाठी महिन्याअखेरीस निविदा काढण्यात येणार आहेत. हा रोपवे तयार झाल्यावर चारकोप कांदिवलीतील नागरिकांचा प्रवासही सोईचा ठरणार आहे.