महाराष्ट्रातून 2.45 लाख कामगारांची त्यांच्या राज्यात पाठवणी : गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई | लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या परराज्यातील सुमारे दोन लाख ४५ हजार ६० कामगारांना विशेष श्रमिक रेल्वेद्वारे त्यांच्या मूळ राज्यात पाठवण्यात आले, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी दिली.
२२ मार्चपासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. अनेक राज्यांतील कुशल-अकुशल कामगार महाराष्ट्रात अडकून पडले होते. त्यांच्या विनंतीनुसार नियमांचे पालन करून १९१ ट्रेनने २ लाख ४५ हजार ६० कामगार, मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये एकही ट्रेन गेली नव्हती, बिहारमध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना फोनद्वारे विनंती केली. त्यानंतर त्यांनी परवानगी दिली. शनिवारी सकाळी ८.१५ वाजता पश्चिम बंगालसाठी बांद्रा ते हावडा ही पहिली विशेष रेल्वे ट्रेन सोडण्यात आली. या दोन्ही राज्यांसाठी प्रत्येकी कमीत कमी १० रेल्वे दररोज सोडण्याची गरज आहे. या परप्रांतीय कामगारांना पाठवण्याचा सर्व खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून केला आहे. यासाठी एकूण ५४.७० कोटी रुपये त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केले आहेत. राज्यात ३८८४ शेल्टर असून यामध्ये ३ लाख ७१ हजार कामगार आहेत. त्यांची जेवणासह सर्व व्यवस्था राज्य शासन करत आहे.