महाराष्ट्राची वाटचाल कोरोनामुक्तकडे
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे दिलासादायक वक्तव्य
मुंबई | प्रतिनिधी
सातत्यानं वाढणारा कोरोना बाधितांचा आकडा आता कमी होत आहे. शिवाय कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचे दिलासादायक वक्तव्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. मात्र तरीही धोका टळलेला नाही ही बाबही तितकीच महत्त्वाची, असल्याचे त्यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना नमूद केले.
कोरोना व्हायरसने सर्वत्र कहर केलेला असतानाच महाराष्ट्रातून मात्र एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. जवळपास मागील दीड महिन्यांची आकडेवारी पाहता राज्यातील कोरोना परिस्थिती हळुहळू सुधारत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सातत्यानं वाढणारे कोरोनारुग्ण आणि नियमांचं उल्लंघन करणारे अनेक नागरिक यांनी शासनाची डोकेदुखी वाढवलेली असतानाच आता मात्र हे चित्र बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे.
आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, राज्यात 1 नोव्हेंबरला कोरोना बाधितांची एकूण रुग्णसंख्या 16 लाख 83 हजार 775 इतकी होती. तर, सक्रिय रुग्णसंख्या 1 लाख 25 हजार 109 इतकी होती. 5 डिसेंबरला एकूण रुग्णसंख्या 18 लाख 47 हजारांवर होती. तर, उपचार घेणाऱ्या अर्थात सक्रिय रुग्णांची संख्या 82 हजार 849 इतकी कमी झाली होती. ही एकंदर कडेवारी पाहता कोरोनातून सावरणाऱ्यांची संख्या जास्त असल्याची बाब समोर येत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या रिकव्हरी रेटवर भर दिला. राज्यातील रिकव्हरी रेट हा 94 टक्क्यांवर पोहोचला असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातील कोरोना रुग्णांचा ‘डबलिंग रेट’ही 350 दिवसांवर गेल्याचं टोपे म्हणाले.
कोरोन लसीकरणासाठी काही लसींची चाचणी अखेरच्या टप्प्यात असून, सदर कंपन्यांनी लसीकरणासाठी अधिकृत परवानगीही केंद्राकडे मागितली आहे. ज्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचं टोपे म्हणाले. लसीकरणासाठी राज्यात मनुष्बळ, यंत्रणा, कोल्डचेन अशा सर्व घटकांवर राज्याची पूर्ण तयारी झाली आहे. त्यामुळं उद्यापासूनही लसीकरण सुरु केल्यास महाराष्ट्र त्यासाठी पूर्ण तयार आहे, असा विश्वास त्यांनी दिला.