breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

बीजमाता राहीबाईंची कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी घेतली भेट

जुन्या वाणांच्या संवंर्धनाचं काम राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत नेणार : कृषीमंत्र्यांची ग्वाही

मुंबई| महाईन्यूज | प्रतिनिधी

‘माझी माय पण मातीच्या भांड्यात बियाणे साठवूण ठेवायची. तुमचं काम पाहून मला आईची आठवण झाली’, अशी भावना राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी ‘बीजमाता’ राहीबाई पोपेरे यांच्याजवळ व्यक्त केली. रयतेच्या राजाच्या जयंती दिनी शेतकऱ्यांसाठी लाख मोलाचे काम करणाऱ्या राहीबाईंची भेट घेण्यासाठी कृषीमंत्र्यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे गाव गाठले. देशभर ‘सीडमदर’ म्हणून ओळख बनलेल्या राहीबाईंना ‘पद्मश्री’ जाहिर झाल्याबद्दल या कृषीमातेचा साडीचोळी देऊन कृषीमंत्र्यांनी सत्कार देखील केला.
राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली आहे. ते काम राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभाग सहकार्य करील. मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या स्थानिक वाणांच्या संवंर्धनाला चालना देतानाच त्याच्या बीजोत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत केले जाईल, असे कृषीमंत्री श्री.भुसे यांनी सांगितले.
स्थानिक देशी बियाण्यांचं वाण जतन करण्याचं अमुल्य काम त्या करीत असून राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत त्यांचं काम पोहोचावे यासाठी कृषी विभाग त्यांना सहकार्य करीलं.
स्थानिक वाणात पोषण मुल्य भरपूर असल्याने मानवी आरोग्याला ते उपयुक्त आहेत त्यामुळे आता अनेकांचा ओढा सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या अन्न घटकांकडे वाढला आहे, असे कृषीमंत्री यावेळी म्हणाले.
राहीबाईं करीत असलेल्या कामाचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे सादर करू असे कृषिमंत्र्यांनी यावेळी सांगितले. त्या करीत असलेल्या कामाला मोठं स्वरूप देऊ. त्यांचं जुन्या वाणांचं संवर्धनाच काम शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे. स्थानिक वाण प्रसाराला मदत करतानाच ही संकल्पना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली जाईल, अशी ग्वाहीही कृषीमंत्र्यांनी यांवेळी दिली. यावेळी कृषीमंत्र्यांनी राहीबाईंच्या सीडबँकेची पाहणी केली.
राहीबाई यांच्याकडे सर्व प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. त्यांच्याकडे जे बियाणे आहे ते शेकडो वर्षे आपले पूर्वज खात होते ते मुळ स्वरूपात आहे. त्यांनी तीन हजार स्त्रीया व शेतकरी यांचा बचतगट बनवलाय. त्यांच्या मार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रीय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते.
राहीबाईंनी भाजीपाला, भात, गहू, बाजरी, कडधान्ये पीकांच्या ११२ प्रकारचे वाण जतन करून ठेवले आहेत. त्यांनी महिला शेतकऱ्यांचा गट स्थापन करून त्यामाध्यमातून जुन्या वाणांचे बीजोत्पादन केले जाते. आतापर्यंत सुमारे एक लाख लोकांनी त्यांनी तयार केलेले बियाणे त्यांच्याकडून नेले आहे. देशभरातून कृषी तंत्रज्ञान शिकणारे अनेक विद्यार्थी त्यांचा हा प्रकल्प बघायला येतात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button