फसवणूक टाळण्यासाठी ५० हजारांवरील धनादेशासाठी पॉझिटिव्ह पे प्रणाली
मुंबई – मोठ्या रक्कमेच्या धनादेशातून ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी आरबीआयने धनादेशाच्या देवाण-घेवाणीच्या नियमात बदल केला आहे. त्यानुसार आता पन्नास हजार आणि त्यावरील धनादेशांसाठी पॉझिटिव्ह पे प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
पॉझिटिव्ह पे प्रणालीतून धनादेश देताना बँक खातेदाराकडून त्याची संपूर्ण माहिती घेतली जाणार आहे. या माहितीच्या आधारे संबंधित ग्राहकांची नंतर पडताळणी केली जाणार आहे. ही पडताळणी केल्यानंतर या प्रणालीनुसार धनादेशाचे पैसे संबंधिताला दिले जाणार आहेत. या प्रणालीबाबतच्या मार्गदर्शक सूचना आरबीआय लवकरच जारी करणार आहे. या नवीन प्रणालीत धनादेश देताना खातेदाराला धनादेशाचा क्रमांक, धनादेशाची तारीख, ज्याच्या नावे काढला आहे त्याचे नाव, खाते क्रमांक, रक्कम आदी माहितीसह धनादेशाच्या दोन्ही बाजूचा फोटो काढावा लागणार आहे. त्यानंतर जेव्हा संबंधित व्यक्ती बँकेतून पैसे काढेल तेव्हा बँक या प्रणालीद्वारे ही माहिती पडताळून पाहून नंतरच पैसे दिले जाणार आहेत.