फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय रद्द; महापरीक्षा पोर्टल बंद
मुंबई |महाईन्यूज|
महाविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकारने घेतलेले अनेक निर्णय रद्द केले आहेत. अशातच आता महापोर्टल मार्फत होणारी शासकीय भरती बंद होणार असून शासन भरतीचे काम नव्या संस्थेला देण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
राज्य शासनातील गट ‘क’ आणि ‘ड’च्या पदभरतीसाठी नव्या संस्थेची निवड केली जाणार आहे. महाआयटी मार्फत या नव्या संस्थेची निवड केली जाणार आहे. याबाबत राज्य सरकारने निर्णय जारी केला आहे. महापोर्टलबाबत आलेल्या तक्रारीनंतर महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
‘महापोर्टल बंद केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसाहेबांचे मनःपूर्वक आभार. आता दुसरं कोणतंही पोर्टल न आणता यापुढील नोकरभरती ही ‘एमपीएससी’मार्फतच व्हावी आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ‘एमपीएससी’ला ताकद द्यावी, ही विनंती. हे पोर्टल बंद होण्यासाठी माझ्यासह सुप्रिया सुळे आणि अनेक आमदारांनी पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आलं असून राज्यातील हजारो तरुणांना यामुळे दिलासा मिळणार आहे,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी दिली आहे.