पोलीस बदल्या प्रकरण : महाविकास आघाडीमध्ये मतभेद नाही : गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : मुंबई पोलिस आयुक्तांनी ज्या अंतर्गत बदल्या केल्या होत्या त्या बदल्या गृहखाते आणि मुख्यमंत्री कार्यालयाने रद्द केल्या आहेत, अशी माहिती गृहमंत्री
अनिल यांनी दिली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसून चांगला समन्वय असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ४ दिवसामध्येच रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेला हा निर्णय म्हणजे गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांना धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा निर्णय रद्द केल्यामुळे सरकारमधील मतभेद आणि समन्वयाचा अभाव पुन्हा समोर आला आहे.
दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या वादावर खुलासा केला आहे. ‘मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी ज्या अंतर्गत बदल्या केल्या, त्या माझ्या कार्यालयाने आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने रद्द केल्या आहेत. आमच्या सरकारमध्ये चांगला समन्वय आहे आणि कोणताही मतभेद नाही,’ असं अनिल देशमुख म्हणाले आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या या खुलाशानंतर तर आणखी प्रश्न उपस्थित होत आहेत. गृहमंत्री जर मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी या बदल्या केल्याचं म्हणत असतील तर पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना न विचारताच या बदल्या केल्या का? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना त्याला गृहमंत्र्यांची परवानगी लागते. पोलिसांच्या बदल्यांचे आदेशाचं परिपत्रक बघितलं तर ते मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाने नाही, तर गृहविभागाने म्हणजेच अनिल देशमुखांच्या खात्याने काढलं आहे. मग गृहमंत्री या बदल्या मुंबई पोलीस आयुक्तांनी केल्या आहेत, हे कोणत्या आधारावर म्हणतात? तसंच पोलीस आयुक्तांना अशा बदल्यांचे अधिकार नाहीत.