पत्रकारांवर हल्ला करणा-यावर कारवाईची धनंजय मुंडेंची मागणी
मुंबई – महाराष्ट्रातील पत्रकारांवर वारंवार हल्ले होत आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचेच हे उदाहरण असून आरोपींवर तातडीने कारवाई झाले पाहिजे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
गावदेवी पोलिस स्टेशनच्या हद्दीत टाइम्स नाऊचे पत्रकार हरमन गोम्स यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातून कसेबसे वाचलेले हरमन गोम्स गावदेवी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यास गेले तर पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली. तसेच मारहाण केल्याचे पुरावे मागण्यात आले. त्यामुळे हल्लेखोरांना तत्काळ अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच तक्रार घेण्यास टाळाटाळ करणा-या पोलिसांवरही तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पत्रकारांच्या विविध संघटनांकडून करण्यात येत आहे.
या घटनेचा धनंजय मुंडे यांनी तीव्र निषेध केला आहे. ते म्हणाले की, पत्रकारांवर होणारे हल्ले चिंताजनक असून महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची तातडीने दखल घेवून आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
https://twitter.com/dhananjay_munde/status/1051355914442137600