नांदगाव हादरले ; पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची गळा चिरुन हत्या
मनमाड | पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांच्या हत्याकांडामुळे नाशिक हादरलं आहे. नांदगावमध्ये घराबाहेर झोपलेल्या एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली.
नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्यातील वखारी गावात घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. चव्हाण दाम्पत्यासह त्यांच्या दोन लहानग्या लेकरांची हत्या करण्यात आली. 37 वर्षीय समाधान चव्हाण, 32 वर्षीय भारतीबाई चव्हाण या पती-पत्नीसह त्यांची सहा वर्षाची मुलगी आराध्या चव्हाण आणि 4 वर्षाचा मुलगा गणेश चव्हाण यांचा मृतांमध्ये समावेश आहे. समाधान चव्हाण रिक्षाचालक होते. चव्हाण कुटुंब काल रात्री घराबाहेर झोपले होते. मात्र सकाळी चौघंही जण रक्ताच्या थारोळ्यात सापडले. त्यांच्या हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. खून कोणी केला, दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने हत्या केली का, याचा तपास सुरु आहे.