दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना कोरोनाची मोफत लस मिळण्यासाठी आग्रही – आरोग्यमंत्री राजेश टोपे
![Health Minister Rajesh Tope urges BPL citizens to get free corona vaccine](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/RAJESH-TOPE.jpg)
मुंबई । प्रतिनिधी
दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना कोरोना लस मोफत मिळालीच पाहिजे, असा आग्रह राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धरला आहे. मोफत लसीबाबत केंद्राने निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. मात्र गरिबांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे राजेश टोपे म्हणाले. तसेच राज्यात 8 जानेवारीला सर्व जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचं ‘ड्राय रन’ होणार असल्याची माहिती टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबईत कोरोना लसीकरण आणि नव्या विषाणूसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री राजेश टोपे बोलत होते. या वेळी कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचे राज्यात एकूण आठ रुग्ण असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली. दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना कोरोनाची लस मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. “सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रण्ट लाईन कर्मचारी, जुना आजार असलेले 50 वर्षांवरील रुग्ण अशा जवळपास तीन कोटी जणांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. उद्या आरोग्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत गरिबांना मोफत लस देण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरणार आहे. गरिबांना लसीच्या दोन डोससाठी 500 रुपये लादणं हे योग्य ठरणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने हा खर्च उचलावा. जर केंद्र सरकारने हा खर्च केला नाही तर राज्य सरकारच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. राज्य सरकारच्या राज्याच्या अखत्यारित येणाऱ्या लोकांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, अस राजेश टोपे यांनी सांगितले.