‘…तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापि माफ करणार नाही’, राजू पाटलांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
डोंबिवली: प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेले भूस्खलन रोखण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानकडून निधी संकलन सुरु आहे. या निधी संकलनाची माहिती मिळताच आमदार राजू पाटील यांनी 5 लाखांची मदत केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजाच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड-किल्ले ढासळत असताना सरकार आणि पुरातत्व खात्याचे त्याकडे लक्ष नाही. मात्र, अनेक सामाजिक संस्था आणि संघटना ते वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी शिवाजी महाराजांचे नाव सांगून सत्ता भोगत आहेत.
मात्र, गड-किल्ल्याकडे त्याचे अजिबात लक्ष नाहीये. गड-किल्ल्याकडे दुर्लक्ष करत महत्वाच्या नसलेल्या गोष्टींना सरकारकडून जाणीवपूर्वक महत्व दिले जात असल्याचा आरोप आमदार राजू पाटील यांनी केलेला आहे. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या गड-किल्ल्यांची देखरेख करण्यासाठी राज्य सरकारने एखादे स्वतंत्र मंडळ तयार करावे, अशी मागणी आपण राज्य शासनाकडे करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलेलं आहे.
राजू पाटील म्हणाले, “छत्रपतींच्या नावाने केवळ राजकारणच होणार असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. अरबी समुद्रात शिवस्मारक उभं राहील तेव्हा राहील, पण ही जी शिवरायांची खरी स्मारकं आहेत ती जर आपण जपली नाहीत तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापि माफ करणार नाही.”
शिवाजी महाराजाचे स्मारक समुद्रात बांधता येत नसेल तर सिंधुदुर्ग किल्ल्यावर बांधा. महाराजांचा त्या किल्ल्यावर वावर होता हे सांगणारे अनेक पुरावे आहेत. तिथे त्यांचे राज्यातील एकमेव मंदिर आहे. मात्र सत्ताधारी राजकारणी लोकांच्या भावनेशी खेळत महाराजांच्या नावाने राजकारण करत आहेत. त्यापेक्षा किल्ले संवर्धन करणाऱ्या संस्थांच्या पाठिशी उभे रहा. स्मारके लोकसहभागातून झाली पाहिजे हे यापूर्वी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ब्लू प्रिंटमधून मागणी केलेली आहे.