ठाण्यात जंतुमिश्रित पाणी,नागरिक झाले संतप्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-105.png)
ठाणे | महाईन्यूज |
लांबलेला पाऊस, तुडुंब भरलेले जलाशय यामुळे अंबरनाथच्या पिण्याच्या पाण्याची परिस्थिती समाधानकारक आहे. मात्र, वडवली भागातील नागरिकांना मात्र मागील वर्षीप्रमाणे पुन्हा जंतुमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने तेथील नागरिक संतप्त झाले आहेत.
अंबरनाथच्या शिवाजीनगर, वडवली आणि महालक्ष्मीनगर या भागाला चिखलोली धरणातून नियमित पाणीपुरवठा केला जातो. चिखलोली धरणातून नागरिकांच्या घरी होणाऱ्या पाणीपुरवठ्यात लाल रंगाच्या अळ्या आढळून आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जोशी यांनी दिली. मागील वर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीदेखील चिखलोली धरणातून अळ्या आणि दूषित पाणीपुरवठा झाला होता. त्यावेळी नागरिकांच्या तक्रारीवरून चिखलोली धरणातील पाणीपुरवठा करणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याने काही महिने थांबवले होते आणि पर्यायी व्यवस्थेद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. वडवली विभागातील बॉंबे हाऊस आणि परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुन्हा अशुद्ध आणि अळीमिश्रित पाणीपुरवठा होऊ लागल्याचे जोशी यांनी सांगितले.
परिसरातील मनसेचे माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांची भेट घेऊन खराब पाणीपुरवठा होत असल्याचे जोशी यांनी त्यांच्या निदर्शनाला आणून दिले. अळीमिश्रित पाण्याचे नमुने घेऊन जीवन प्राधिकरण खात्याच्या कार्यालयात गेलो असता, तेथे एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. तरीही पुन्हा अधिकाऱ्यांची भेट घेऊन अशुद्ध पाणीपुरवठा त्वरित थांबवावा. पाणी तापवून आणि गाळून घ्यावे, असे नागरिकांना आवाहन केले आहे.