ठाण्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने रक्ताच्या उपलब्धतेसाठी रुग्णांची मुंबईकडे धाव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Capture-56.jpg)
ठाण्यातील रक्तपेढ्यांमधील तंत्रज्ञांच्या कमतरतेमुळे रक्ताच्या उपलब्धतेसाठी कोरोना काळामध्ये ठाणेकरांना मुंबईवर अवलंबून राहावे लागत आहे. ठाण्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याचे बोलले जातं आहे.
रक्तातून संसर्ग होऊ नये तसेच रक्तपेढ्यांचे काम सुरळीत व्हावे यासाठी ‘नॅको’ने नियमावली तयार करून रक्तपेढीमधील कर्मचारीसंख्या निश्चित केली आहे. मात्र ठाण्यातील (कोकण विभाग) अन्न व औषध प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीस रक्तपेढ्यांमध्ये एकूण १४६ कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे रक्ताची उपलब्धता, प्रक्रिया आणि करोना संसर्गाच्या काळामध्ये प्लाझ्मा थेरपी देण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
‘नॅको’च्या नियमावलीनुसार ज्या रक्तपेढ्यांचे वार्षिक रक्तसंकलन पाच हजार युनिटपेक्षा कमी आहे त्यांच्याकडे पाच तंत्रज्ञ, रक्तदानशिबिरांचे आयोजन करण्यासाठी तीन, रक्त विघटीकरणासाठी एका तांत्रिक निरीक्षकाची गरज असते. एकूण दहा तांत्रिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता असतानाही अनेक रक्तपेढ्या या एक तसेच दोन तंत्रज्ञांच्या जिवावर कामाचा गाडा ओढत आहेत. ३७ रक्तपेढ्यांपैकी केवळ सात रक्तपेढ्यांनी मनुष्यबळाच्या पूर्ततेचे निकष पूर्ण केले आहेत. निकषांची पूर्तता झाली नसेल तर त्या रक्तपेढीचा परवाना रद्द करणे किंवा ना हरकत प्रमाणपत्र नाकारण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासन तसेच राज्य रक्त संक्रमण परिषदेला आहे. मात्र या तीस रक्तपेढ्यांच्या संदर्भात हा निर्णय का घेण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अनेक ठिकाणी तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता होत नसल्याच्या तक्रारी येतात, तर काही खासगी रक्तपेढ्यांमध्ये पुरेसे वेतन दिले जात नसल्यानेही मनुष्यबळाची उपलब्धतेमध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अशा रक्तपेढ्यांमध्ये चोवीस तास काम करणे, शिबिरांमध्ये जाऊन रक्त गोळा कऱण्यासह करोना काळामधील प्लाझ्माच्या उपलब्धतेसंदर्भातील निकषांची पूर्तता करण्याचे काम कसे पूर्ण केले जाते, असा प्रश्न उपस्थित होतो.
मुंबईतील रक्तदानाची परिस्थिती लक्षात घेता सध्या समाधानकारक स्थिती असली तरीही हा रक्तपुरवठा पुरेसा नाही. लो. टिळक रुग्णालयामध्ये ए पॉझीटीव्ह १, एबी -८, ओ- ३० राजावाडीमध्ये ए -६, बी – १, एबी -६, ओ- ० अशा प्रकारच्या रक्ताची उपलब्धता आहे. या रक्तपेढ्यांमध्ये सध्या १५० ते २०० रक्ताच्या पिशव्या उपलब्ध आहेत. करोना काळामध्ये त्या मुंबईतील रुग्णांचीच गरज पूर्ण करणाऱ्या नाहीत. एकट्या लो. टिळक रुग्णालयातील २८० थॅलेसेमिया रुग्णांना रक्ताची गरज असते.