गृहमंत्र्यांनी कंगनाला धमकावले, हे आम्ही चालू देणार नाही – किरिट सौमय्या
मुंबई | राज्याच्या गृहमंत्र्यांनी कंगना राणावतला धमकावल्याचा आरोप करीत, हे आम्ही चालू देणार नाही, अशा शब्दांत भाजपा प्रवक्ते किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. “कंगना राणावतने मुंबईबाबत विधान करत चूक केली आहे. प्रत्येक मुंबईकर तिच्या या विधानाशी असहमत आहेत. त्यामुळे तिनं आपलं विधान मागं घ्यायलाच हवं, मात्र महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तिला धमकावणं हे आपण चालू देणार नाही.
राज्य सरकार राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाची प्रकरणे तसेच या परिस्थितीशी लढण्यासाठी बेडची उपलब्धता आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांबाबतच्या महत्वाच्या विषयांपासून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे.
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख कंगनाच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की, “मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी होत असते. अतिशय सक्षमपणे मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस काम करत असतात. अशा परिस्थितीत एखाद्या कलाकाराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हास्यास्पद आहे. आज मुंबई तसंच महाराष्ट्र पोलिसांच्या हाती मुंबईत सुरक्षित आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीही ते सक्षम आहेत. जर मुंबई, महाराष्ट्र सुरक्षित नाही असं वाटत नसेल तर त्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही”